नगर / जलभूमी वृत्तसेवा
राज्य सरकारने नव्या निकषांनुसार मिशन बिगिन अगेनच्या मार्गदर्शक सूचना लागू केल्या आहेत. त्यानुसार सोमवारपासून (७ जून) ही अनलॉक प्रक्रिया सुरू होत आहे. पहिल्या लेव्हलमध्ये समावेश असलेल्या जिल्ह्यांमध्ये सर्वकाही खुले होणार असे म्हटले आहे. यामध्ये आठवडे बाजारासह धार्मिक स्थळांचा समावेश असणार का? हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.
राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा अहमदनगरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ याबद्दल म्हणाले की, ‘यातील सर्व याचा अर्थ दुकाने आणि व्यवहार असा ढोबळ मनाने आहे. लग्न, अत्यंविधी, अन्य कार्यक्रम आणि धार्मिक स्थळे यासंबंधी काही बंधने असणार आहेतच. ती कोणती असतील याबद्दल लवकरच सविस्तर आदेश काढला जाईल. मिशन बिगीन अगेन मध्ये राज्य सरकारने पाच स्तर करून त्यानुसार निकष ठरविण्यात आले आहेत. यासंबंधीच्या मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
प्रत्यक्ष आदेश काढण्याचा आधिकार त्या त्या जिल्हाधिकाऱ्यांना आणि महापालिका आयुक्तांना देण्यात आला आहे. राज्याने जाहीर केलेल्या यादीत पहिल्या लेव्हलमध्ये जे जिल्हे आहेत, तिथे सर्वकाही खुले होणार, असे म्टटले आहे. त्यामुळे काहीच निर्बंध नसणार का? धार्मिक स्थळे, लग्न समारंभ, अंत्यविधी, शाळा-कॉलेज, आठवडे बाजार यांचे काय होणार याचे स्पष्ट उत्तर अद्याप मिळालेले नाही. मुश्रीफ अहमदनगर येथे आले होते. त्यावेळी त्यांनी अहमदनगर जिल्हा निकषांनुसार पहिल्या टप्प्यात येत असल्याने सोमवारपासून सर्वकाही खुले होणार असल्याचे जाहीर केले.
धार्मिक स्थळे आणि इतर गोष्टींचे काय होणार, याबद्दल विचारले असता, 'सध्या तरी दुकाने आणि अन्य व्यवहार सुरळीत सुरू होणार हे स्पष्ट झाले आहे. आता आपण लेव्हल एकमध्ये आलो असलो तरी पुन्हा संसर्ग होऊ नये, यासाठी काळजी घ्यावीच लागणार आहे. त्यामुळे धार्मिक स्थळे, लग्न समारंभ, अंत्यविधी, अन्य सभा, कार्यक्रम अशा गर्दी होणाऱ्या ठिकाणांबद्दल काय निर्णय घ्यायचा, तो विचारपूर्वक घ्यावा लागणार आहे. जिल्हाधिकारी यासंबंधीच्या परिस्थितीचे अवलोकन करून सविस्तर आदेश काढतील. यामध्ये या सर्व गोष्टी स्पष्ट होतील,' असे मुश्रीफ यांनी सांगितले.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...