बाळासाहेब जाधव
अहमदनगर / जलभूमी वृत्तसेवा
पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही दीर्घकाळ रेड झोनमध्ये समावेश असलेल्या नगर जिल्ह्यात शेवटच्या टप्प्यात कमालच झाली. नव्याने जाहीर करण्यात आलेल्या निकषानुसार जिल्ह्याचा समावेश थेट पहिल्या स्तरात झाला. त्यामुळे सोमवारपासून (७ जून) निर्बंध शिथील होऊन सर्व व्यवहार पूर्ववत झाले आहेत. राज्य सरकारच्या नव्या निकषांनुसार जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी निर्बंध उठविल्याचा आदेश जारी केला आहे.
जिल्ह्याचा साप्ताहिक पॉझिटीव्हीटी दर ४.३० टक्के आणि ऑक्सिजन बेडवरील रुग्णांचे एकूण उपलब्ध ऑक्सिजन बेडशी असलेले प्रमाण २४.४८ टक्के आहे. त्यामुळे अहमदनगर जिल्हयाचा निर्बंधस्तर एकमध्ये समावेश झाला आहे. त्यानुसार सोमवारपासून सर्व व्यवहार खुले झाले आहेत. कोविड सुसंगत वर्तणुकीचे पालन करणे नागरिकांना बंधनकारक असून त्या अटीवर हे निर्बंध उठविण्यात आले असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेशात म्हटले आहे.
कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही सुरवातीला अहमदनगर जिल्ह्याला मोठा फटका बसला होता. रुग्णांची संख्या आणि मृत्यूंचे प्रमाणही वाढले होते. त्यातच मे महिन्यात १८ वर्षांखालील मुलांमध्ये संसर्ग होण्याचे प्रमाणही वाढले होते. एप्रिल आणि मे महिन्यात ऑक्सिजन, रेमेडेसिवीर, बेड आणि अन्य औषधांसाठीही रुग्णांसह प्रशासनाचीही मोठी धावपळ उडाली होती. सुरवातीच्या काळात बाधित रुग्णांचे आकडे झपाट्याने वाढत गेले.
पुण्या-मुंबईपेक्षाही अहमदनगरची परिस्थिती गंभीर होते की काय, अशी स्थिती निर्माण झाली होती. सुमारे ४८ लाख लोकसंख्या असलेल्या जिल्ह्यात दोन्ही लाटांत मिळून २ लाख ६७ हजार ८५ नागरिकांना करोनाचा बाधा झाली. त्यापैकी २ लाख ५६ हजार ६७५ बरे झाले. दुर्दैवाने ३ हजार ४४३ नागरिकांचा यामध्ये मृत्यू झाला. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८० पर्यंत खाली घसले होते. ते आता सावरून ९६.१० टक्क्यांवर पोहचले आहे. शहरासोबत ग्रामीण भागातही संसर्ग पसरत होता. त्यानंतर मात्र कडक उपाययोजना हाती घेण्यात आल्या. अहमदनगर जिल्ह्यात एक महिन्याचा कडक लॉकडाउन पाळण्यात आला.
या काळात किराणा, भाजी, फळे विक्रीही बंद ठेवण्यात आली. तेव्हापासून बाधितांचे आकडे झपाट्याने कमी होण्यास सुरवात झाली. त्याच वेळी हिवरे बाजाराचा करोनामुक्तीचा पॅटर्न पुढे आला. त्याप्रमाणे सर्व गावांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन करण्यात आले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीतही या विषयावर चर्चा झाली. अर्थात सर्वच ठिकाणी याची काटेकोर अंमलबजावणी झाली नसली तरी लोकांमध्ये जाणीवजागृती होण्यास मदत झाली. गावोगावी कडक लॉकडाउन पाळण्यात येऊ लागला.
एका बाजूला प्रशासन आणि दुसरीकडे नागरिक ग्रामस्थांनीही पुढाकार घेत करोनाविरूद्धची लढाई लढली. त्याची चांगली फळे मे महिन्याचा शेवटच्या आठवड्यात पहायला मिळाली. ज्या वेगाने कोरोना रुग्णांची संख्या वाढत गेली, तेवढ्याच झपाट्याने ती उतरत गेली. मधल्या काळात साडेचार हजारांवर गेलेली दैनंदिन रुग्ण संख्या या आठवड्यापासून हजाराच्या आत आली आहे. संपूर्ण जिल्ह्यात सातशे ते आठशेच्या दरम्यान रुग्ण आढळत आहेत. यामुळे एकीकडे रुग्णांची संख्या, बाधितांचे प्रमाण कमी होत असताना दुसरीकडे बेड रिकामे होत गेले. याचा परिणाम म्हणून नागरिकांना अपेक्षा नसताना एकेकाळी रेडझोन मध्ये असलेला जिल्हा थेट स्तर एक मध्ये आला.
त्यामुळे एकाचवेळी सर्व निर्बंध उठून व्यवहार सुरळीत झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार सर्व प्रकारची दुकाने, सेवा, खासगी कार्यालये, खासगी व सार्वजनिक वाहतूक, सरकारी कार्यालये, हॉटेल नेहमीप्रमाणे सुर होणार आहेत. मॉल, चित्रपटगृह, नाट्यगृह ५० टक्के क्षमतेने सुरू झाले आहेत. विवाहांसाठी शंभर तर अंत्यविधीसाठी ५० व्यक्तींचे बंधन आहे. सार्वजनिक ठिकाणे, खुली मैदाने, जॉगिंग पार्क, स्थानिक स्वराज्य संस्था, सहकारी संस्थांच्या सर्वसाधारण सभा, निवडणुका, वस्तू व सेवांचे ई-कॉमर्स व्यवहार यांना आता कोणतीही बंधने नाहीत. धार्मिक स्थळे आणि शाळा मात्र अद्याप बंदच राहणार आहेत.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
आपली कमेंट याठिकाणी लिहा...